रेवदंडा : प्रतिनिधी
बहुजन क्रांती मोर्चातर्फे 8 जानेवारी रोजी अलिबागमध्ये मोर्चा काढला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य व रायगड जिल्हा भाजप चिटणीस उदय काठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मोर्चामध्ये ब्राह्मण समाजाला कलंक-कसाई संबोधण्यात येऊन तशी घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाने जातीय व धार्मिक सलोखा बिघडविण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून आयोजकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेेदनात करण्यात आली आहे. उदय काठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना दिलेल्या निवेदनावर भाजपचे विकास काठे, संकेत जोशी, देवन सोनावणे व राजेश पाटील यांच्याही स्वाक्षर्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार दुसर्यांदा हाती घेतल्यापासून धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे, नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणे असे निर्णय त्यांनी घेतले आहेत. जनतेचे जीवनमान सुकर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना समर्थन देण्याऐवजी काही व्यक्ती, संस्था आडकाठी आणत आहेत. त्याचा काठे यांनी निषेध केला.