नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’परीक्षा पे चर्चा’ या कार्याक्रमाद्वारे दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून न जाऊ नये. अपयशी झालो तर आपण यशाच्या दिशेने जात आहोत, असा त्याचा अर्थ होतो, असे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमात एकूण दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षकांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांमध्ये रायगडचा गोविंदराजू हाही उपस्थित होता. या वेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारले. त्यावर मोदींनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. विद्यार्थी आणि माझा संवाद ’हॅशटॅग विदाउट फिल्टर’ अशा स्वरुपाचा असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी नव्या पिढीशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न केला.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर गोष्टींसाठीही काही वेळ द्यायला हवा. त्यांनी केवळ अभ्यासावरच तेवढे लक्ष केंद्रित करू नये. आपले मन प्रसन्न करण्यासाठी काही वेगळेही करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात म्हणाले.
अनेकदा आई-वडील आपल्या मुलांवर अभ्यासाप्रमाणे इतर एक्स्ट्रा अॅक्टिव्हीटीज करण्यासाठी दबाव टाकत असतात, पण आई-वडिलांनी असे करणे योग्य नव्हे. मुलांना रूची कशात आहे हे ओळखून त्यांनी मुलांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper