अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग-पेण मार्गावर टेम्पोची टँकरला धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) पहाटे घडली. निखिल नरेंद्र पाटील (रा. मुळे, ता. अलिबाग) आणि गणेश श्रीराम कांदू (रा. आंग्रेवाडा, अलिबाग) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत, तर अजय विजय गवई (रा. आंग्रेवाडा, अलिबाग) हा जखमी असून, त्याच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निखिल पाटील, अजय गवई व गणेश कांदू हे तिघे उरणहून महिंद्रा मॅक्झिमो टेम्पोने (एमएच 06 बीजी 3013) अलिबागकडे येत होते. त्यांचा टेम्पो पहाटे अलिबाग तालुक्यातील पळी येथे आला असता, त्याने समोरून येणार्या टँकरला (एमएच 06 एसी 6465) धडक दिली. या अपघाताच्या आवाजाने पळी गावातील लोक जागे झाले. त्यांनी टेम्पोमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून त्वरित अधिक उपचारासाठी त्यांना पनवेल येथे नेत असताना निखिल पाटील आणि गणेश कांदू या दोघांचा मृत्यू झाला, तर अजय गवई याच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची खबर टँकरचालकाने पोयनाड पोलीस ठाण्यात दिली. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार जे. डी. पवार अधिक तपास करीत आहेत.
Check Also
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन
विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …
RamPrahar – The Panvel Daily Paper