Breaking News

मध्य प्रदेशात राजकीय धूळवड

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशात धूळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 10) ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील सोबत होते. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे आता भाजपत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर 19 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सहा मंत्र्यांच्या हाकालपट्टीची शिफारस राज्यपालांना केली आहे. यामध्ये इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्दुमन सिंह तोमर, डॉ. प्रभुराम चौधरी यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजप नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचे समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचे कळते.
म. प्रदेश विधानसभेचे अधिवेशन 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करून काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या म. प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत बंगळुरू गाठले. या आमदारांत कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. 16 मार्चला विधानसभेच्या पहिल्या सत्रात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply