Breaking News

कोकणावर अन्याय करू नका!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सरकारला आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
निसर्गसंपदा असलेल्या कोकणावर अन्याय करू नका, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आमदार ठाकूर यांनी कोकणाची बाजू समर्थपणे मांडत कोणत्याही परिस्थिती कोकणावर अन्याय होऊ नये, अशी रोखठोक भूमिका घेतली आणि कोकणाला अधिक समृद्ध करण्यासाठी सभागृहात जोरदार मागणी केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले कि, कोकणाच्या निसर्गसंपदेबद्दल या सदनात अनेकवेळा चर्चा झाली आहे. चालू अधिवेशनातही या विषयावर आणि पुढच्या आव्हानाबद्दल चर्चा झाल्या आहेत. आम्ही कोकणाला काय देणार हे सरकारने सांगितले आहे, पण अर्थसंकल्पामध्ये कोकणासाठी काय आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी मात्र कोकणाच्या हातात काहीही उरत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प कोकणासाठी आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी नाही हे जे मत मांडले आहे ते खरे आहे आणि हीच भावना खेदाने व्यक्त करावी लागत आहे.
कोकणाच्या अनुषंगाने गेली अनेक वर्षे या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा करण्यात आल्या. कोकणाच्या निसर्गसंपदेला संरक्षित करून त्या माध्यमातून पर्यटन विकास करून विकासाच्या मार्गाने पुढे जाण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. कोकणातील अनेक प्रकल्प मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर कोकणासाठीचा निधी कोकणाला न देता अन्य जिल्ह्यांना दिला जात आहे. मग अशा पद्धतीने कोकण वाढेल आणि कोकणातील रोजगार वाढेल अशी अपेक्षा सरकार कशी करीत आहे, असा सवाल आमदार ठाकूर यांनी सभागृहात उपस्थित केला.
निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, मात्र सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद पहायला मिळत आहे. कोकणामध्ये आजच्या घडीला जे काही उद्योग आहेत या उद्योगांच्या मार्फत प्रदूषण वाढू नये या दृष्टिकोनातून जी पाऊले उचलली पाहिजेत ती दुर्देवाने उचलली जात नाहीत. पाणी, हवा प्रदूषणावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंकुश ठेवला पाहिजे तोसुद्धा शासन ठेवत नाही. माझ्या पनवेल मतदारसंघात जे औद्योगिक कारखाने आहेत.  
तेथे प्रदूषणाची मर्यादा प्रचंड ओलांडली गेली आणि त्यामुळे त्याच्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे उद्योगांमार्फत रोजगार कमी होऊ लागला आहे, पण आज जे उद्योग आहेत त्या उद्योगांच्या माध्यमातून जर प्रदूषणाच्या निकषांचे पालन होत नसेल, तर सरकारला पुढे येऊन तंत्रज्ञानाच्या आणि सक्तीच्या नियमांच्या आधारे या प्रदूषणावर अंकुश ठेवलाच पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.
रायगड जिल्ह्याची लोकसंख्या 26 लाख 34 हजारांच्या वर पोहोचली आली आहे. अशा वेळेला या लोकसंख्येला चांगल्या जीवनाची मानके द्यायला आम्ही कबूल आहोत कीनाही याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पनवेल परिसराची आता महानगरपालिका झाली आहे आणि या महापालिकेच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा आणि हवेचा प्रदूषणाचा त्रास लोकांना होत आहे. तो दूर करण्यासाठी सरकारने कडक पावले उचललीच पाहिजेत, अस त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या आधारे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि लोकांना विश्वासात घेऊन प्रदूषणावर अंकुश आणण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनसंख्या गाव आणि शहरांमध्ये वाढत असून, येथे पनवेल महानगरपालिका, सिडको परिसर, नवी मुंबई विमानतळाचा विकास, तसेच जिल्ह्यात अनेक शहरे, नगर, गावे आहेत त्यातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाणी, सिंचनाची व्यवस्था काय आहे. आता पुणे जिल्ह्यातील धरणांचे रायगड जिल्ह्याकडे येणारे पाणी आता बंद करून वरच्या दिशेला वळवता येईल का याचा अभ्यास शासनाने सुरू केला आहे, पण त्याच वेळेला सर्वाधिक पाऊस पडणार्‍या कोकणात सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याच्या तुटवडा आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या सिंचनाच्या आणि पाण्याच्या एकूण व्यवस्थेच्या बाबतीत स्वतंत्रपणे आढावा बैठक घेऊन त्यावर योग्य उपाययोजना केली पाहिजे, अशी सूचनाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
अर्थसंकल्पाचा संपूर्ण आवाका पाहता कोकणाच्या द़ृष्टिकोनातून पाणी, रोजगार, पर्यटन, या सर्व बाबतीत कोकणाच्या पदरात काहीही पडत नसेल, तर निश्चित चिंतेचे आहे. कोकणच्या विकासासाठी मला अपेक्षा आहे. त्यामुळे कोकणाच्या विकासाचा सरकारने विचार करावा, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करून कोकणावर अन्याय करणार्‍या अर्थसंकल्पाचा निषेध करीत असल्याचा सभागृहात आवर्जून उल्लेख केला. एकूणच कोकणाकडे माणुसकीच्या नजरेने बघा, अशी हाक आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारला दिली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply