
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभेच्या 18 जागांसाठी 26 मार्च रोजी होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 26 मार्चला देशभरातील सात राज्यांमध्ये एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. राज्यसभेत रिक्त झालेल्या एकूण 55 जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची आहे. त्यापैकी 37 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित 18 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार होती, मात्र देशभरात झालेल्या कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या या 18 जागांची निवडणूक नेमकी कधी होणार याचा निर्णय देशभरातील परिस्थिती पाहून घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरात आतापर्यंत सुमारे 500 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही संख्या जाहीर केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper