पनवेल : प्रतिनिधी
युद्धात बाँबस्फोट अथवा सुरुंगस्फोट होऊन जीवितहानी होते. बाहेर पडल्यास तशीच जीवितहानी कोरोनामुळे होते हे लक्षात असू द्या, कोरोनाबाबत अजूनही जनमानसात हवे तितके गांभीर्य दिसत नसल्याने पनवेलमधील डॉ. ययाती प्रभाकर गांधी यांनी नागरिकांना काळजी घ्या, स्वतःची अन् इतरांची ही असा सल्ला दिला आहे. हस्तांदोलनातून तसेच पृष्ठभागांशी प्रत्यक्ष स्पर्श होऊन कोरोना पसरतो. यामुळे अशा ठिकाणी स्पर्श टाळणे अन् स्पर्श झाल्यावर साबणाने अथवा अल्कोहोलमिश्रित द्रावणाने (सॅनिटायझर) व्यवस्थितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. शिंक-खोकल्यातून बाहेर पडणारे बारीक थेंब हवेत पसरतात. अनेक पृष्ठभागांना चिकटून राहतात. हे एक प्रकारचे सुरुंगच आहेत. आपल्या शरीरात घुसून कसा घात करतील सांगू हे शकत नाही. असे कण हॉस्पिटल व दवाखान्यात जास्त असणार. यामुळे खरोखर मोठा आजार असला तरच बाहेर पडावे. अनेक वर्ष अॅसिडिटी आहे आणि आता तिखट खाऊन ती जास्त झाली आहे किंवा वर्षभर किडलेला दात गार खाल्ल्यावर दुखतोय म्हणून येणारे पेशंट बघून वाईट वाटते. अर्थात डॉक्टरांना नाही दाखवले तर जीवाला धोकादायक असेल तर बाहेर पडावेच. कोराना विषाणूचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी तसेच तशी लक्षणे आढळ्यास काय करावे, काय करु नये असे मार्गदर्शन पनवेलच्या डॉ. ययाती गांधी यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper