Breaking News

कोकणात 29 हजार 638 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप

नवी मुंबई : विमाका

प्रत्येक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 5  एप्रिल 2020 या पाच दिवसात कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांतील एकूण 11 लाख 71 हजार 638 शिधापत्रिका धारकांना तब्बल 29 हजार 638 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. टंचाई भासवून चढत्या दराने विक्री करणार्‍या दुकानदारांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

कोकण विभागातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 45 लाख 99 हजार 968 आहे. या लाभार्थ्यांना तीन हजार 838 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. कोंकण विभागात या योजनेमधून सुमारे 42 हजार 811 क्विंटल गहू, 74 हजार 405 क्विंटल तांदूळ, तर एक हजार दोन क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. योजनेकरिता तांदळाचे नियतन त्या-त्या जिल्ह्यात असलेल्या भारतीय खाद्य निगम कडून प्राप्त करून घेतले जात 10 एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

-जास्त दराने विक्री केल्यास कारवाई

किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती संबंधितांनी  दिली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply