कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या हर्याची वाडीमध्ये पाणीटंचाई जाणवत असते. तेथील आदिवासी लोकांना पाणी नेण्यासाठी डोंगर उतरून पायथ्याशी यावे लागत होते, परंतु आदिवासी विकास विभागाने नळपाणी योजना तयार केल्याने तेथील आदिवासींचे हाल आता संपणार आहेत.
आदिवासी पेण प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी उपयोजनेतंर्गत 14 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या योजनेमधून कर्जत तालुक्यातील वारे हर्याची वाडी येथे विहिरीवर पंप बसवून पाईपलाईनद्वारे पाणी वस्तीवर पोहोचविण्यात आले तसेच वाडीत एक साठवण टाकीही बांधण्यात आली असून, टाकीत साठविलेले पाणी वाडीत तीन-चार ठिकाणी सार्वजनिक स्टँडपोस्ट बसवून सर्वांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासींची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. हर्याची वाडीची सुमारे 200 लोकसंख्या आहे. पाणीयोजना नसल्याने महिलांना अनेक वर्षांपासून पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत होती. ग्रामस्थांकडून पाणीटंचाई समस्या निवारणासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला गेला. अखेर त्याची दखल आदिवासी विभागाने घेऊन या वाडीच्या नळपाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 14 लाख इतका निधी सहा महिन्यांपूर्वी मंजूर केला होता. ठेकेदाराने काम सुरू करून ते वेळेत पूर्ण केल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.