अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग समुद्र किनार्यावर मंगळवारी (दि. 7) बैलगाडी शर्यतीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. विनायक जोशी (वय 70, रा. अलिबाग) आणि राजाराम गुरव (वय 75, रा. झिराड, अलिबाग) अशी मृतांची नावे आहेत.
अलिबाग कोळीवाड्यातर्फे धुळवडीचे औचित्य साधून मंगळवारी समुद्र किनार्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम गटातील शर्यत सुरू असताना बैल उधळून गाडी प्रेक्षकांमध्ये घुसली. या दुर्घटनेत विनायक जोशी आणि राजाराम गुरव हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेत असतानाच रात्री मृत्यू झाला, तर राजाराम गुरव यांचे बुधवारी (दि. 8) सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.
या अपघातप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात बैलगाडी स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
Check Also
निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …
RamPrahar – The Panvel Daily Paper