अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्याही फेरा वाढवू लागली आहे. 12 तालुक्यांमधील 66 गावे, 226 वाड्या असे मिळून एकूण 292 ठिकाणी 31 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पेण, महाड, पोलादपूर, उरण, पनवेल, खालापूर, रोहा, पाली, श्रीवर्धन, मुरूड, तळा, कर्जत या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आहे. उरण तालुक्यातील पाच वाड्या, पनवेल पाच गावे व पाच वाड्या, कर्जत तीन गावे व 10 वाड्या, खालापूर एक गाव व चार वाड्या, पेण 11 गावे व 82 वाड्या, सुधागड दोन गावे व चार वाड्या, रोहा चार गावे, दोन वाड्या, महाड सात गावे व 55 वाड्या, पोलादपूर 30 गावे व 57 वाड्या, श्रीवर्धन एक गाव, मुरूड एक गाव आणि तळा तालुक्यातील एक गाव व दोन वाड्यांवर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दरवर्षी रायगड जिल्ह्यात तीन हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो. तरीदेखील पाणी साठवण्याचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून यंदा साधारण 283 गावे आणि 794 वाड्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे . सध्या 12 तालुके टँकरग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. 66 गावे आणि 226 वाड्या अशा 292 ठिकाणी 31 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात 415 विंधण विहिरींची कामे प्रस्तावित आहेत. त्यातील 136 कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले. त्यापैकी 131 कामांना मंजुरी मिळाली. याशिवाय 20 गावे आणि 15 वाड्यांवरील नळपाणी योजनांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper