मुरूड : प्रतिनिधी
सर्वसाधारणपणे 1 जूनपासून मासेमारी बंद होते, मात्र यंदा कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे मुरूडमधील मच्छीमारांनी नौका महिनाभर आधीच किनारी आणून शाकारण्यास सुरुवात केली आहे.
चालू वर्षी नैसर्गिक संकटांच्या मालिकांमुळे मासेमारी न झाल्याने आधीच मच्छीमार बांधवांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत. अशातच कोरोना व त्यामुळे असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे मच्छीमारांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. परिणामी मुरूडमधील सुमारे 100 नौका नाईलाजाने किनार्यावर ओढण्यात आल्या आहेत. सध्या केवळ 30 ते 40 छोट्या नौका उथळ समुद्रात मासेमारी करतात, परंतु त्यांना मोठी मासळी अभावानेच मिळते. कोरोना काळात बर्फ येत नसल्याने मासळी साठविण्यास मर्यादा येत आहे.
मच्छिमारांचा डिझेल परतावा अद्याप आलेला नाही. एकंदर परिस्थिती पाहता नुकसान सहन करण्यापेक्षा पावसाळी मच्छीमारी बंद होण्यापूर्वी 15 दिवस आधीच नौका किनार्यावर ओढून बोटींची डागडुजी, जाळीची दुरुस्ती अशी कामे मच्छीमारांनी हाती घेतल्याचे दिसून येते.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper