Breaking News

रेशनकार्ड नसलेल्यांसाठी इझिफॉर्मस मोबाइल अॅप

अलिबाग : प्रतिनिधी

रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींनाही धान्याचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यासाठी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने इझिफॉर्मस हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या अ‍ॅपमुळे काम करणे सुकर झाले आहे. त्यामुळे रायगडचे हे अ‍ॅप आता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये वापरले जात आहे.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य देण्याबाबत अ‍ॅप्लिकेशन तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार पाऊल उचलत रायगड जिल्हा पुरवठा विभागाने पुणे येथील अभिनव आयटी सोल्युशनमार्फत इझिफॉर्मस हे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे.

इझिफॉर्मस अप्लिकेशनमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव, मोबाइल नंबर, आधार कार्ड व इतर माहिती भरून घेतली जात आहे. माहिती भरून झाल्यानंतर त्वरित लाभार्थी व्यक्तीला धान्य दिले जाते. हे अ‍ॅप जिल्ह्यातील सर्व रेशनदार दुकानदारांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात रेशनकार्ड नसलेल्यांसाठी 926 मेट्रिक टन धान्य आले आहे. एक लाख 85 हजार व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. 22 मेपासून या अ‍ॅपद्वारे 552 नागरिकांनी धान्याचा लाभ घेतला आहे.

मौजे शेनाटे परिसर विषाणूबाधित क्षेत्र

अलिबाग ः जिल्ह्यातील तळा तालुक्यातील मौजे शेनाटे येथे तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या मौजे शेनाटे, ता. तळा येथील कोरोना रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर, यशवंत चोरगे यांच्या घरापासून बाळाराम बटावले यांच्या घरापर्यंत उत्तरेकडे, बाळाराम बटावले यांच्या घरापासून यशवंत गंभीर यांच्या घरापर्यंत पश्चिमेकडे, हेमंत बटावले ते यशवंत गंभीर, सुरेश बटावले यांच्या घरापर्यंत दक्षिणेकडे, सुरेश बटावले ते यशवंत चोरगे यांच्या घरापर्यंत पूर्वेकडचा परिसर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी

दिवीपारंगी आदिवासीवाडीनजीकच्या शेतावरील किंजालीचे झाड तोडले व आंबे चोरीस गेल्याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला चौघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिवीपारंगी येथील कृष्णा घरत यांनी शेतावरील किंजलीचे झाड तोडले व आंबे चोरीस गेल्याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे केली होती.त्याचा राग मनात धरून सोमवारी सायकांळी महाजने-दिवी आदिवासीवाडी येथे शेतावर लेंडीखत आणण्याकरिता ते गेले असता किशोर नाईक, किशोरचा लहान भाऊ, निराबाई नाईक आणि येरीबाई यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबतची तक्रार कृष्णा घरत यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply