Breaking News

कोल्हापुरात युतीचा मेळावा विक्रमी होणार

चंद्रकांत पाटील यांचा दावा, तयारीचा आढावा

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या 24 मार्च रोजी कोल्हापुरातील मेळाव्यातून होणार आहे. या मेळाव्याची सभा ही विक्रमी उपस्थितीची राहील आणि त्यातून युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली जाणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात युतीला लोकसभेमध्ये 45 जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

कागल येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित शिवसेना भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पाटील बोलत होते.  सध्या भाजपत अन्य पक्षातील मोठमोठे नेते येत असल्याचा धागा पकडत पाटील म्हणाले की, पुढचा बॉम्ब खूपच मोठा आहे. हे सगळे बॉम्ब फोडून झाल्यावर मी मतदारसंघात बसून राहणार आहे. प्रियंका गांधी काँग्रेसच्या सभेत येणार हे काही नवीन नाही. आजचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नाही, तर बघायला येतो अन्यथा देशाच्या पंतप्रधान हेमामालिनी झाल्या असत्या, असेही पाटील या वेळी म्हणाले.

संजय मंडलिक म्हणाले की, जनतेनेच ही निवडणूक  हातात घेतली आहे. या वेळी सेनेचे सहा आमदार, भाजपचे दोन आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांचे पाठबळ असल्यामुळे ही निवडणूक जिंकणे फार सोपे झाले आहे. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले की, आता भावनिक आवाहन करण्यापेक्षा वैयक्तिक मतदारांना संपर्क साधून संजय मंडलिकांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ या. माजी आमदार संजयबाबा घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, जिल्हा परिषद शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांची भाषणे झाली.

सपा बसप युतीचा राज्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झालेली आहे. राज्यातही त्यांची आघाडी झाली असून, ती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राज्यातील छोट्या पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरूच असले तरीही सप आणि बसप या दोन पक्षांनी आघाडीने लढण्याचे ठरविले आहे. बसप राज्यात 48 जागा लढवणार असे जाहीर केले होते. बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली जाणार नाही, असे जाहीर केले आहे. समाजवादी पक्षाने भिवंडी लोकसभेची जागा मागितली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी सुरू आहे. सप आणि बसप यांनी आघाडी केल्याने वंचित बहुजन आघाडीप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आणखी एक आव्हान तयार झाले आहे.

बसपची विदर्भात ताकद आहे, तर सपला मुस्लीम बहुल मतदारसंघात मतदान होण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, लातूर, धुळे, परभणी या लोकसभा मतदारसंघांत मुस्लीम मतदारांचे प्रमाण सरासरी 12 टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे या मतदानावर सपचे लक्ष आहे. त्यामुळे बसप-सपची आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणार असल्याचे मानले जाते.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply