
गोठ्यांचे नुकसान; साठवलेला चारा, पेंढाही भिजला
शेतकरी व दुध उत्पादक चिंतीत
माणगांव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात गुरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असून पावसाळ्यासाठी भरून ठेवलेल्या चारा पेंढ्याचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 3 जूनला आलेल्या चक्रीवादळात घरे झाडे व इमारती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी व दुध व्यावसायिकांवर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा फटका जनावरांनाही बसलेला पहायला मिळत आहे.
वादळाने गोठ्यांवरील छप्पर उडाले असून अनेक गोठे पूर्णपणे मोडुन पडले आहेत. ऐन पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकर्यांनी पावसाळ्यासाठी गोठ्यांमध्ये चारा पेंढा भरून ठेवला होता. पुढील पाच महिन्यांसाठी आवश्यक त्या पेंढ्याची तजवीज शेतकर्यांनी केली होती. पावसाळ्यासाठी साठवणूक केल्या गेलेल्या या पेंढ्याच्या ठिकाणांना व गोठ्यांचे निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान होऊन गुरांचे हे खाद्य पदार्थ पूर्णपणे भिजले आहेत. पावसाळ्यात हिरवा चारा मिळत असला तरी गुरांसाठी पेंढा आवश्यक असतो. अजून पाऊस सुरु होऊन हिरवा चारा तयार होण्यास दहा ते पंधरा दिवस लागणार आहेत.
ऐन पावसाळ्यासाठी शेकडा 400 ते 500 रुपये देउन शेतकरी व दूध व्यावसायिकांनी पेंढा भरून ठेवला होता. चक्रीवादळाने गुरांचे गोठे वैरण पूर्णपणे भिजून गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात गाई गुरांना चारा, पेंढा कोठून उपलब्ध करावयाचा असा प्रश्न शेतकरी व दूध उत्पादक यांना पडला आहे. सुक्या चार्याची पावसाळ्यात गंभीर समस्या निर्माण होणार असून शेतकरी व दुध उत्पादक चिंतेत आहेत.
पावसाळ्यासाठी गोठ्यात सुका पेंढा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला होता. निसर्ग वादळाने गोठ्याचे छप्पर उडाले, गोठा पडला व साठवून ठेवलेला पेंढा भिजून गेला. पावसाळ्यात हिरवा चारा मिळेल परंतु हिरवा चारा तयार होण्यास अजून पंधरा दिवस तरी जातील. पावसाळ्यात सुका चारा गुरांना आवश्यक असतो यावर्षी मात्र तो भिजला असल्याने सुका पेंढा कोठून आणावयाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– बाळाराम भोनकर, दूध व्यावसायिक, शेतकरी.