मुरूड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्यात वीज मंडळाचे अतोनात नुकसान होऊन 650पेक्षा जास्त पोल निकामी झाले, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या 12 दिवसांपासून खंडित आहे. परिणामी मुरूड शहरासह तालुक्यातील 72 गावे अंधारात आहेत.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून तेथे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, मात्र तोच न्याय मुरूड तालुक्याला देता आलेला नाही. त्यामुळे विविध बँक व आर्थिक संस्थांचे कामकाज ठप्प आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मंत्रीमहोदयांंनी भेटी दिल्या, परंतु ते वीजपुरवठा काही पूर्ववत करू शकले नाहीत. वीज मंडळालाही याचे सोयरसुतक नाही. वरिष्ठ कार्यालयाशी कोणताही संपर्क नसल्याने अतिरिक्त कर्मचारी कुमक मिळेनाशी झाली आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने मुरूड शहरात नऊ दिवसांपासून पाणी कमी प्रमाणात मिळत आहे. मोबाईल टॉवर बंद असल्याने नेटवर्क नाही. बँक व्यवहार ठप्प असून, एटीएमही बंद आहेत. एकंदर मुरूडची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अशात अजून किती दिवस मुरूड तालुका अंधारात राहणार, हे वीज मंडळाचे अधिकारी ठामपणे सांगत नाहीत.