Breaking News

अभिनंदनच्या सलामतीमुळे पाक बचावला

अन्यथा भारताकडून झाला असता घातक क्षेपणास्त्र हल्ला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान संबंधात 27 फेब्रुवारीला कमालीचा तणाव निर्मााण झाला होता. मिग-21 बायसनचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चे प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्याशी संपर्क साधला. भारतीय वैमानिकाला इजा पोहचल्यास आक्रमक पावले उचलली जातील, अशी धमकी त्यांनी असीम मुनीर यांना दिली होती.त्या दिवशी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी परस्परांवर क्षेपणास्त्र डागण्याची तयारी केली होती, असे वृत्त आहे. नवी दिल्लीतील या सर्व घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धस्मान यांनी वैमानिकाच्या सुटकेबद्दल मुनीर यांच्याशी चर्चा केली. राजस्थानमध्ये भारताने छोट्या पल्ल्याची जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या 12 क्षेपणास्त्रांची तैनाती केली होती. त्याबद्दलही दोघांमध्ये चर्चा झाली. अनिल धस्माना यांच्याप्रमाणेच एनएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसएस जॉन बोलटॉन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी हॉटलाइनवरून चर्चा केली.

अभिनंदन वर्धमान यांना शारीरिक इजा पोहचवली तर हे भारत अजिबात सहन करणार नाही, असे डोवाल यांनी बोलटॉन आणि पॉम्पिओ यांना स्पष्ट केले होते. कुठल्याही अटी आणि शर्तीशिवाय इम्रान खान सरकारने अभिनंदन वर्धमान यांची सुटका करावी यासाठी डोवाल आणि धस्माना यांनी संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या अधिकार्‍यांबरोबरही चर्चा केली होती.भारत पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी तयार आहे, तसेच भारताने 12 क्षेपणास्त्रे सज्ज ठेवल्याचे डोवाल यांनी बोलटॉन यांना सांगितले होते का, या प्रश्नावर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने काहीही बोलण्यास नकार दिला. 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी नऊ लक्ष्यांवर भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानातच्या सरकारी आणि लष्करी नेतृत्वाला वाटत होती.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारतातील 13 लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी केली होती. 27 फेब्रुवारीला रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान हल्ला होईल, असे पाकिस्तानी नेतृत्वाचा अंदाज होता. भारताकडून मिसाइल हल्ला होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीमधील लष्करी तळ, रहिवासी वसाहतींमध्ये पूर्णपणे काळोख करण्याचे आदेश दिले होते. लाहोरमधील असकारी हाऊसिंग सोसायटी आणि कराचीमधील मालीर कॅन्टॉनमेंटमधील लोकांनी ही माहिती दिली. अण्वस्त्राबद्दल माहिती नाही, पण विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना इजा पोहचल्यास कारवाई करण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदींनी दिले होते. भारत त्यादृष्टीनेच मिसाइल हल्ल्यासाठी तयार होता, असे मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply