पनवेल : वार्ताहर
तालुक्यातील कोंडले आणि मोरबे धरणावर पर्यटकांसाठी पनवेल परिसरासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आदी भागातून पर्यटक दरवर्षी वर्षासहलीसाठी येत असतात. या पर्यटकांमुळे परिसरातील शांतता भंग पावतेच त्याचप्रमाणे जीवीतहानीचे प्रकारसुद्धा घडतात. सध्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावावर पोलीस यंत्रणेने अशा पर्यटकांना या ठिकाणी येण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
पनवेल तालुक्यातील कोंडले आणि मोरबे येथील पर्यटन स्थळांवर व धरणावर तरूण मंडळी वर्षासहलीसाठी येत असतात. त्यावेळी उघड्यावरच मद्यसेवन करणे, अन्न शिजवणे, उरलेले अन्न, प्लॅस्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या व इतर वस्तू तेथेच टाकून जाणे, त्याचप्रमाणे धोकादायक पद्धतीने वाहने उभी करून नाचगाणे करणे, शिटी मारणे, धोकादायक वळणावर सेल्फी काढणे, खोलपाण्यात उतरणे असे प्रकार घडत असतात. यातूनच नाहकपणे तरूणांचे जीवही जातात. अशा पर्यटकांवर पोलीस यंत्रणेने बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यातयेत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper