मोहोपाडा ः प्रतिनिधी
कष्टकरीनगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी विश्वनाथ गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट बोलून दाखविला. अण्णा भाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत जाऊन स्वतःच्या महत्त्वाकांक्षांवर लिहायला- वाचायला शिकून त्यांच्यामधील प्रतिभावंत विचारांना जागा मोकळी करून दिली. अण्णा भाऊ साठे हे मातंग समाजातील उपेक्षित वर्गातील होते. उपेक्षित समाजाचे दु:ख त्यांनी जवळून पाहिले होते.अन्याय-अत्याचार अनुभवला होता. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणारा नायक असतो. त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले, पण त्यांनी त्यांच्या क्रांतिवादी विचारांना कधीही मरू दिले नाही.
त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी मोठे योगदान होते. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये 13 लोकनाट्ये, तीन नाटके, 13 कथासंग्रह, 35 कादंबर्या, एक शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, एक प्रवास वर्णन आणि सात चित्रपट कथा आदींचा समावेश होता. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते काका गायकवाड, सुधाकर गायकवाड, दादासाहेब आटपाडकर, अशोक सोनावणे, सुनील राठोड, हनुमंत साठे, भानुदास गायकवाड, विनोद कांबळे, नंदू खैरनार, वैभव गायकवाड, तुषार गायकवाड आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper