नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईकर जनता ही कोरोनाने पिचलेली आहे. अशा महामारीत नवी मुंबईकरांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे पालिकेने नवी मुंबईकरांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी. याधीच 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ करावा असा ठराव सभागृहात मंजूर करून तो शासनाकडे पाठवलेला आहे. याबाबत आयुक्तांनी पाठपुरावा करावा असे मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केले. कोविड संदर्भात पुन्हा एकदा मंगळवारी नाईक यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रादुर्भाव वाढणार असल्याने व्हेंटीलेटर्स व आयसीयूची संख्या 200 पर्यंत वाढवावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. यासाठी आयुक्तांना विविध खासगी रुग्णलयांची नवे देण्यात आली आहेत. या रुग्णालयांकडून पालिकेला व्हेंटिलेटर्ससाठी साहाय्य मिळेल असेही आमदार नाईक म्हणाले. टेस्टिंग लॅब एक आठवड्यात पूर्ण होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. तसेच पालिकेने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकरात द्यावी. तसेच अनेक कंपन्या लस निर्मितीसाठी वेगाने प्रयत्न करत असून त्यासाठी पालिकेने कंपन्यांशी पत्रव्यवहार करून जास्तीत जास्त लसी नवी मुंबईकरांना मिळतील याची खात्री करावी. एमआयडीसीत बंद असलेल्या कंपन्यांत कोविड केअर सेंटर सुरू करावे. वाशी प्रदर्शन केंद्रात एक्सरे, डायलसीस मशीन उपलब्ध करावी, अशा विविध मागण्यात आयुक्तांकडे केल्याचे आमदार गणेश नाईक यांनी केल्या.