शेतकर्यांना कर्ज मिळण्यासाठी आक्रमक पवित्रा
कर्जत : बातमीदार
राज्य सरकारने कर्जमाफी घोषित केली, मात्र त्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केले. खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा शेतकर्यांना कर्ज देण्यास बँका दिरंगाई करीत असून, अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकर्यांना नाहक त्रास देत आहेत. या विरोधात भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 13) कर्जत शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकर्यांना सुलभरीत्या कर्ज मिळावे यासाठी भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार भाजप किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक पवार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष स्नेहा गोगटे, तसेच गायत्री परांजपे, मंदार मेहेंदळे, रमाकांत जाधव, रवी जाधव, दिनेश भरकले, धनंजय थोरवे, संजू ठाणगे आदी पदाधिकारी व कायकर्ते सहभागी झाले होते.
सातबारा, आठ अ व आधार कार्ड घेऊन शेतकर्यांना कर्ज द्यावे तसेच किसान क्रेडीट कार्ड द्यावे आदी मागण्यांचे निवेदन बँकेला देण्यात आले. मागण्यांची पूर्तता होऊन शेतकर्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.