मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन

कर्जत : बातमीदार
कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचवेळी नागरिक खंडित वीजपुरवठा यामुळे संतप्त असताना वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून येत आहेत. यामुळे वीज ग्राहकांना होत असलेला मनस्ताप लक्षात घेऊन कर्जत शहर भाजपने कर्जत महावितरण कार्यालयात जाऊन वीज समस्यांबाबत महावितरणचे सहायक अभियंता आनंद घुले यांना निवेदन दिले.
कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयात जाऊन निवेदन देऊन जनतेच्या विविध तक्रारीचे ताबडतोब निवारण झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. यामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे तो सुरळीत झाला पाहिजे, वेळेवर आणि रिडींग प्रमाणे बिल द्यावे, वाढीव बिल कमी करून मिळावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. येणारा गणेशोत्सव लक्षात घेऊन त्यापूर्वी ह्या सर्वं मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
या वेळी कर्जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनिल गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, मंदार मेहेंदळे, नगरसेवक बळवंत घुमरे, विशाखा जिनगरे, स्वामीनी मांजरे, यांच्यासह गायत्री परांजपे, दिनेश भरकले, समीर घरलुटे, मिलिंद खंडागळे, विशाल सुर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.