वेलिंग्टन : वृत्तसंस्था
भारतीय संघातील यष्टीरक्षक ऋषभ पंत त्याच्या खराब कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात संधी न मिळालेल्या पंतचे कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने कान टोचले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी एका पत्रकार परिषदेत अजिंक्यने पंतसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
पंतने लवकरात लवकर ही गोष्ट स्वीकारली पाहिजे की तो खराब काळातून जात आहे. त्याला फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. पाच महिन्यांपूर्वी पंत भारतीय संघाचा तिन्ही क्रिकेट यष्टीरक्षक होता, पण कसोटीत वृद्धिमान साहाने त्याची जागा घेतली, तर वन डे आणि टी-20मध्ये केएल राहुलवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. पंतला अनेक संधी दिल्यानंतरदेखील त्याने त्याचा फायदा घेतला नाही आणि खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसावे लागले, असे अजिंक्य रहाणेने सांगितले.
पंतसंदर्भात बोलताना अजिंक्य म्हणाला की, तुम्ही कोणत्या अवस्थेतून जात आहात हे समजून घेणे आणि त्याचा स्वीकार करणे फार गरजेचे असते. सकारात्मक राहिले पाहिजे. अन्य खेळाडूंपासून मग ते ज्युनिअर असो की सीनिअर त्यांच्यापासून अधिक शिकले पाहिजे.
कोणत्याही खेळाडूला वाटत नाही की त्याने संघाबाहेर राहावे, पण जेव्हा संघाला तुमच्याकडून काही खास सामन्यात अपेक्षा असते तेव्हा ती पूर्ण करण्याची जबाबदारीदेखील तुमचीच असते. मेहनत करून एक क्रिकेटपटू म्हणून स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करावी, असा सल्लाही अजिंक्यने या वेळी दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper