Breaking News

शेतकर्यांनी मानले भाजपचे आभार

आमदार महेश बालदी यांच्यामुळे सुटला गोवठणे गावातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले. मात्र रुंदीकरणासाठी लागणारी जमिन मिळविण्यासाठी शेतकर्‍यांसमवेत बैठक घेऊन जमिनीचा प्रश्न सोडविण्यात आला. त्यानंतर गोवठणे गावातील रस्ता रुंदीकरण करण्यात आले. जमिनी घेतलेल्या शेतकर्‍यांना मोबदला देण्याचे वचन यंदाच्या गणेशोत्सवाच्यानिमित्ताने आमदार महेश बालदी यांनी पूर्ण केले. या वेळी शेतकर्‍यांनी त्यांचेे आभार मानले.

गेल्या 35 वर्षापासून गोवठणे गावातील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. मुख्य रस्त्यापासून गाव काही अंतरावर असल्याने सातत्याने येथील नागरिकांना वाहनांनी ये-जा करत असताना अरुंद रस्त्याचा त्रास होत असे. ह्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी भाजप कार्यकर्ते संतोष वर्तक यांनी पुढाकार घेण्याचे ठरविले. संबंधित प्रश्नाचा पाठपुरावा करून त्यांनी हा विषय आमदार महेश बालदी यांच्या समोर मांडला. आमदारांनी पण समस्येची गंभीरता लक्षात घेत तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत संयुक्तिक बैठक घेऊन जिल्हा विकास आराखड्या अंतर्गत सदर रस्तारुंदीकरणासाठी शासकीय निधी मंजूर करून घेतला.

सदर काम देखील अल्पावधीतच सुरु करण्यात आले, मात्र मुख्य प्रश्न पुन्हा उभा राहिला की रस्ता रुंदीकरणासाठी जमीन देईल कोण? आणि ह्याच अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नावर संतोष शांताराम वर्तक, विजय रामचंद्र म्हात्रे, रोशन म्हात्रे, संतोष वर्तक, मनोज पाटील, प्राची निर्णय पाटील यांनी मार्ग काढला. सर्वांनी एकत्र येत प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. समस्येची पार्श्वभूमी आणि गंभीरता पटवून दिली. ’ऐकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपथं’ उक्तीप्रमाणे शेतकर्‍यांची मने वळवून दोन्ही बाजूकडील तीन-तीन फूट जागा विनामोबदला मिळण्याची परवानगी घेतली. मात्र जागा जरी शासकीय पातळीवर विनामोबदला दिली असली तरी आमदारांमार्फत फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही मदत मिळवून देण्याचे वचनच संतोष वर्तक यांनी दिले.

रस्त्याचे काम सुरू झाले आणि दोन वाहने सहज पार होतील असा सुसज्ज व रुंद रस्ता उभा राहिला. मात्र शेतकर्‍यांना दिलेले वचन कोणीही विसरले नव्हतेच, प्रत्येक महिन्याकाठी वचनाचा पाठपुरावा आमदार बालदी यांच्याकडे केला जात होता आणि गणेशोत्सवाच्या मूहुर्तावर आमदारांनी देखील शेतकर्‍यांच्या मनाच्या मोठेपणाची जाणीव ठेवत शेतकर्‍यांना सस्नेह मदत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला.

हा निधी 23 ऑगस्ट रोजी एकुण 20 शेतकर्‍यांच्या घरी जाऊन, श्रींचे दर्शन घेत प्रत्यक्ष रोखीने वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाला रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न तडीस नेणारे संतोष वर्तक, विजय म्हात्रे, कार्याध्यक्ष सुरज म्हात्रे, शाखाध्यक्ष रोशन म्हात्रे, ग्रा.पं.सदस्या प्राची पाटील, ग्रा.पं.सदस्य संतोष वर्तक, मनोज पाटील, प्रविण पाटील, प्रेम पाटील, सुरेंद्र पाटील, उमेश वर्तक, अतिश वर्तक, हर्षल म्हात्रे, निर्णय पाटील, विद्यानंद म्हात्रे, रोहन म्हात्रे, प्रितम वर्तक, बाळा गावंड (आवरे), सूर्यकांत म्हात्रे, पंकेश म्हात्रे (पाले) आदी सहकारी उपस्थित होते. मदत मिळाल्यावर शेतकर्‍यांनी आमदार महेश बालदी आणि संतोष वर्तक समवेत सर्व सेवाभावी सदस्यांचे आभार मानले.

Check Also

अटल सेतूजवळ ‌‘शिवमुद्रा‌’ आणि ‌‘शिवस्मारक‌’ उभारणार; मंत्री आशिष शेलारांसमवेत आमदार महेश बालदींची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या अटल सेतूजवळ रायगडच्या दिशेला असलेल्या एका मोठ्या खडकावर भव्य …

Leave a Reply