मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे, तर आमदारांच्या पीएनादेखील प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय मंत्रिमंडळापासून सर्वच अधिकारी-कर्मचारीवर्गाला कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तशी व्यवस्था विधान भवन परिसरात करण्यात आली आहे, मात्र नियोजनशून्य कारभारामुळे तेथे गर्दी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, या चाचणीदरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढणार तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विधानसभेचे अधिवेशन दोन दिवसांवर आले आहे. अशात विधानसभा अध्यक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसीय अधिवेशनात आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Check Also
नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …
RamPrahar – The Panvel Daily Paper