मुंबई ः राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये होणार्या मृत्यूविषयी चिंता व्यक्त करीत ते कोविड केअर सेंटर आहे की मृत्यूचे आगार, असा सवाल फडणवीस यांनी राज्य सरकारला केला. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या व अंतिम दिवशी विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी राज्यातील कोरोना स्थितीवर भाष्य करीत सरकारच्या उपाययोजनांवर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सातत्याने 20 टक्के संसर्ग दर असून, देशापेक्षा आणि अन्य राज्यांपेक्षा तो कितीतरी अधिक आहे. काल तर संसर्गाचा दर 25 टक्के होता. ही स्थिती भयावह आहे. जम्बो कोविड केअर सेंटर आपण काढले. हे जम्बो कोविड केअर सेंटर आहेत की कुणाला तरी लाभ देण्यासाठी तयार केलेल्या फॅसिलिटी आहेत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला हे वारंवार बाहेर आलंय. बीकेसी कोविड केअर सेंटरचा विचार केला तर गेल्या महिन्यात तिथला मृत्यूदर 37 टक्के आहे. म्हणजे आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मरत असेल, तर मग या कोविड केअर सेंटरमध्ये नेमके चाललंय काय? कशाकरिता आपण हे सुरू केलंय. 37 टक्के दर कशाला म्हणतात. जगात कुठेही असा दर नाही. 37 टक्के लोक कोविड केअर सेंटरमध्ये येऊन मरत आहेत. ही अवस्था विदीर्ण अशी आहे. हे का होतंय, याकडे कुणी बघितलंय का, अशा सवालांच्या फैरी फडणवीस यांनी राज्य सरकारवर झाडल्या.
Check Also
शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …
RamPrahar – The Panvel Daily Paper