
उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील अवघ्या पावणे सहा वर्षांच्या हर्षिती भोईर या चिमुरडीने ट्रेकिंगमध्ये विक्रम केला आहे. या बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हर्षिती भोईर हीने साडेतीन वर्षांची असल्यापासून ट्रेकची आवड जोपासली आहे. फक्त साडेपाच वर्षात तिने दोन रेकॉर्डची नोंद करून आपले आणि आपल्या गावाचे नाव पूर्ण देशात गाजवले आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ येथील राहणारी हर्षिती कविराज भोईर हिने आत्तापर्यंत जवळ जवळ 24-25 ट्रेक करून बालवयातच आपले उद्दिष्ट लोकांच्या नजरेत भरवून ठेवले.
वयाच्या अवघ्या साडेचारव्यावर्षी 8 जून 2019 रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखला जाणारा कळसूबाई शिखर सर करून आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मध्ये नोंदविले. 26 जानेवारी 2020 रोजी अवघ्या 12 तासात महाराष्ट्रातील तब्बल पाच (श्रीवर्धन गड , मनरंजन, लोहगड, विसापूर, आणि तिकोना) किल्ले सर करून आपले नाव वर्ल्ड बुक ऑफमध्ये आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे.