Breaking News

कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सावरले; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

जागतिक कोरोना महामारीच्या संकटात देशाला सावरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 24) येथे केले. देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, स्पर्धेचे आयोजक सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण संयोजक राहुल वैद्य, संध्या शारबिद्रे, राजेश भगत, विजेते स्पर्धक व पालक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपच्या वतीने देशभरात सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘आत्मनिर्भर भारत : माझी संकल्पना’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय सण’ असे विषय होते. पनवेल, उरण व कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी मर्यादित व निशुल्क प्रवेश असलेली ही स्पर्धा आठवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी या गटासाठी होती. स्पर्धेच्या निकालाची घोषणा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका ऑनलाइन कार्यक्रमात करण्यात आली होती. त्यानुसार पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी झाला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रवींद्र कुलकर्णी व उमेश घळसाशी यांनी काम पाहिले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारताला प्रगतीच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून, कोरोना संकटातही देशातील प्रत्येक घटकाचा विचार त्यांनी केला. योग्य वेळी लॉकडाऊन त्याचबरोबर सर्व घटकांसाठी पॅकेज व योजना देण्याचे काम त्यांनी करीत देशातील नागरिकांना आधार दिला. मानवी संस्कृतीचा विसर पडू नये ही संकल्पना घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी काम केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच इतर नेत्यांनी त्यांची विचारसरणी रूजवली, तर जगाचे नेतृत्व भारत करू शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. या वेळी स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे व पालकांचे त्यांनी आभार मानले. आपला देश बहुभाषिक व परंपरा असलेला असून, युवकांचा भरणा असलेल्या नवभारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत, असेही नमूद केले. राहुल वैद्य व संध्या शारबिद्रे यांनी स्पर्धेची संकल्पना विशद केली, तर सुहासिनी पवार व अमृता जोशी यांनी पालकांच्या वतीने आयोजनाबद्दल धन्यवाद दिले.

यांनी पटकाविली बक्षिसे : या स्पर्धेत वैदेही सुनील पवार हिने प्रथम पारितोषिक (पाच हजार रुपये), आंचल गुप्ता आणि अर्पिता अरुण पाटील यांनी द्वितीय क्रमांक (तीन हजार रुपये) श्रुती शशिकांत चावरे हिने तृतीय (दोन हजार रुपये), तर उतेजनार्थ (प्रत्येकी पाचशे रुपये) पारितोषिक सिद्धी अनिल बेडेकर, अमित अतुल जोशी, श्रावणी मिलिंद गुजराथी, सृष्टी विक्रांत शिंदे व मोक्षदा दिनेश शेठ यांनी पटकाविले. त्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply