Breaking News

महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी – मुख्यमंत्री संयमी असल्याचे ऐकून होतो, मात्र मुख्यमंत्रिपदाला न शोभणारी वक्तव्ये त्यांनी केली. वर्षभरात या सरकारने काहीच साध्य केले नाही. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत विकासावर चर्चा नाही, तर फक्त धमकावण्यासाठी मुलाखत दिल्याचे वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमदार प्रवीण दरेकर यांच्या ’ही कसली वचनपूर्ती’ या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीवरील पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. 28) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला न शोभणारे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राग किंवा द्वेषाशिवाय या शपथेचे पालन मुख्यमंत्री करीत नाहीत. ’हात धुवून लागेन आणि पाय धुवून मागे लागेन’ ही वक्तव्ये त्यांना शोभत नाहीत, असेही ते म्हणाले.

ते कितीही एकत्र आले तरी शेवटी जनतेने सरकार कसं चाललंय हे पाहिलं आहे. कितीही एकत्र आले तरी मनाने ते एकत्र येऊ शकत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेतही हे एकत्र येत असतील याचा अर्थ आमची ताकद वाढत आहे. विजेच्या प्रश्नावर सरकारने ऐतिहासिक घूमजाव केले आहे. बदल्यांचे दलाल ज्या प्रकारे फिरतात अशी अवस्था पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही पाहायला मिळाली नव्हती, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. आरे कारशेडचे सत्य मुंबई भाजप प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहचवणार आहे. काही अधिकारी आपल्या फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ’इगो मसाज’ करताहेत, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला.

राष्ट्रपती राजवटीची मागणी नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाच्या सध्याच्या दोन निर्णयांमुळे कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन होऊन राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी योग्य उदाहरणे आहेत, पण आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्ही रस्त्यावर उतरू. यामध्ये कोणावर कारवाई होणार? गृहमंत्री, मुख्यमंत्री की अवैध कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांवर होणार हे सुनिश्चित झाले पाहिजे. पाच वर्षे खुशाल सरकार चालवा, पण गव्हर्नन्स दाखवा. हे सरकार विश्वासघातातून जन्माला आले आहे. स्थगिती ही या सरकारची एकमेव उपलब्धी आहे.

‘ह्या सरकारला जनताच नापास करेल’

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल, असा प्रश्न जनतेला विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन नापास करेल, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने रामदास आठवले यांनी ही टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या इतर नेत्यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. आता रामदास आठवलेंनी तर या सरकारला जनताच नापास करेल, असे म्हटले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply