मुंबई : प्रतिनिधी
राज्यात शेतकर्यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचे वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती, मात्र राज्य सरकारने ती अमान्य करीत केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सरकार चर्चेपासून पळ काढतेय, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकर्यांचे प्रश्न गंभीर आहेत. मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी संकटात आहे. काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला चपराक दिली आहे. असे असताना फक्त विधान मंडळात याबाबत चर्चा होऊ शकते, परंतु सरकार चर्चेपासून पळ काढतेय. बहुतेक सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मग अधिवेशन का होऊ शकत नाही. जर दोन दिवसांसाठी सगळे सदस्य योग्य ती काळजी घेऊन येणार असतील तर दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्यायला हवे, अशी आमची मागणी होती. ती मागणी मान्य झालेली नाही.
राज्य सरकारकडून विधिमंडळाचे अधिवेशन सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असून, आताही केवळ दोन दिवसांचे 14 व 15 डिसेंबर रोजी अधिवेशन ठेवण्यात आले आहे. यापुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्याची मागणी आम्ही केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Check Also
शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …
RamPrahar – The Panvel Daily Paper