प्रवीण दरेकर यांचे आवाहन
महाड : प्रतिनिधी
बिरवाडी ग्रामपंचायत आणि नागरी समस्या येथील प्रस्थापितांना सोडविता आल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या कार्याप्रमाणे बिरवाडी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 11) बिरवाडी येथील प्रचार रॅलीदरम्यान केले.
येत्या 15 जानेवारी रोजी बिरवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून या वेळी भाजपनेही आपले चार उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
रवींद्र राजेंद्र सागवेकर आणि संगीता संतोष हर्डीकर (प्रभाग क्र. 1), दीपाली नितेश मालुसरे (प्रभाग क्र. 5) आणि मंजुषा कमलेश जोशी (प्रभाग क्र. 6) या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बिरवाडी येथे आले होते. या वेळी भाजपच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रवीण दरेकर, बिपीन महामुणकर, जयवंत दळवी, अनिल मोरे, महेश शिंदे, संदीप ठोंबरे या पदाधिकार्यांसह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी मतदारांना आवाहन करताना दरेकर म्हणाले की, गचाळ आणि बकाल बिरवाडीचे वाटोळे लावण्याचे काम शिवसेना आणि काँग्रेसने केले आहे. तुमचे कुटुंब माझी जबाबदारी असे वचन देत बिरवाडीचा रचनात्मक विकास करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनांना बळी न पडता मतदारांनी या वेळी भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास बिरवाडीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन करण्याचे आवाहनही केले.
