Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच अव्वल -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 18) लागला असून माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच एक नंबरचा पक्ष (अव्वल) झाला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजप एक नंबरला येतो यावरुन हेच दिसते, असे ते म्हणाले आहेत.

ज्याप्रकारे भाजपला लोकांनी सर्मथन दिले आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचायतीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्या भागात भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात पाठीशी उभे राहिलेले पंतप्रधान मोदी लोकांनी पाहिले, तर दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर यांना मदत न करणारे सरकार पाहिले. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे. तिघे एकत्र येऊनदेखील भाजप एक नंबरला येते यावरून हेच दिसते, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगले यश मिळाले आहे. खासकरून सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास 80 टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसेच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. रत्नागिरीत मोठे यश मिळाले आहे. ठाणे, रायगडमध्येही यश मिळाले आहे. स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते लढवय्ये आहेत. एकूण जे वातावरण तयार होतेय, आम्ही सातत्याने लोकांना हे सरकार कशा पद्धतीने अन्याय करतेय हे समजावून सांगतोय त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिघे एकत्रित येऊनही भाजप पहिल्या क्रमांकाच पक्ष झाला आहे, असे फडणवीसांनी या वेळी म्हटले.

‘…तेव्हा ट्राफिक थांबलेले असते’

सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेले असते, त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असे सरकार चालवता येत नाही. ट्राफिक सुरूच राहतो सरकारकडे… त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचे मला वाटत आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

कौल भाजपलाच -चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, एखाद्या गावात कमी अधिक होत असते. पण लोकांनी कौल भाजपच्या बाजूने दिला. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत चांगले यश मिळाले आहे. एखाद्या गावात काय झाले हे महत्त्वाचे नाही, पण एकूण कौल भाजपला मिळाला आहे. भाजप आज पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच आमच्यासाठी जागा मोठी असून ती आम्ही व्यापत आहोत, असेही ते म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply