Breaking News

अजिंक्य रहाणेनेच कसोटी संघाचे नेतृत्व करावे

बिशनसिंग बेदी यांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला समजला जाणार्‍या गाबाच्या मैदानावर भारतीय संघाने विजयी पताका फडकवली. 19 जानेवारी 2021 रोजी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाली भारतीय संघाने ‘कांगारूं’चा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका खिशात घातली. यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणेला कौल दिला आहे.

बिशनसिंग बेदी यांनी आपल्या लेखात अजिंक्य रहाणे आणि संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजिंक्य रहाणेला जवळून पाहिले. कुशल कर्णधाराची सर्वांत मोठी बाब म्हणजे तो आपल्या गोलंदाजाचा कसा वापर करतो हे होय. याबाबतीत मी रहाणेचा मोठा चाहता झालो आहे, असे नमूद करून बेदी यांनी म्हटलंय की, तीन कसोटी सामने एखाद्या कर्णधाराचे निरीक्षण करण्यास पुरेशा आहेत. या कसोटी मालिकेत त्याने केलेल्या गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणाची केलेली योग्य प्लेसमेंट यावरूनच त्याचे कुशल नेतृत्व दिसून येते. रहाणेच्या चुका शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, मात्र त्याने आखलेल्या सर्व योजना व्यवस्थित आढळल्या. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात मला कोणतीही उणीव जाणवली नाही.

बेदींनी पुढे लिहिले आहे की, रहाणेचे नेतृत्व पाहून मज्जा आली. अशा परिस्थितीत भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वासाठी माझी पसंती त्यालाच असेल, पण भारतीय संघाचा कर्णधार कोण असावा हे मी ठरवू शकत नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तो निर्णय घ्या. विराट कोहलीला एक दिग्गज फलंदाज म्हणून खेळवणार? की साधारण कर्णधार म्हणून? हा निर्णय क्रिकेट मंडळाचा आहे.

अजिंक्य रहाणेला कसोटी संघाचे कर्णधार करायला हवे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी नेतृत्व द्यावे, असे मला वाटतेय. कदाचित विराट कोहली अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी नेतृत्व ऑफर करू शकतो. जर असे झाले तर भारतीय क्रिकेटसाठी हा निर्णय चांगला असेल, असेही बेदींनी आपल्या लेखात नमूद केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply