कर्जत : बातमीदार
थकीत वीज बिल न भरल्याने कर्जत तालुक्यातील कळंब ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तीन आदिवासी वाड्यांमधील 45घरांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईचा निषेध करून, सर्व आदिवासींच्या वीज जोडण्या त्वरित पुर्ववत कराव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा कळंब भागातील कार्यकर्ते शिवराम बदे यांनी महावितरणला दिला आहे. कळंब ग्रामपंचायत हद्दीतील तीन आदिवासी वाड्यांमधील सुमारे 50 घरांना भरमसाठ वीज बिले आली आहेत. हे आदिवासी बांधव मोलमजुरी करतात. त्यांचा वीज वापर कमी असतांना महावितरणने पाठविलेले भरमसाठ बिल एक रक्कमी भरणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र महावितरणने कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा नोटिसा न देता 45घरांचा वीज पुरवठा खंडित केल्याने तिन्ही आदिवासी वाड्या अंधारात गेल्या आहेत, असे शिवराम बदे यांनी सांगितले.
कळंब ग्रुपग्रामपंचायत हद्दीमधील तीन आदिवासी वाड्यांची मागील दोन वर्षांपासून थकबाकी असल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आम्ही त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. -विकास पवार, शाखा अभियंता, महावितरण, कर्जत