नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय साकारत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप-डब्ल्यूटीसी) पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, मात्र अजूनही भारताला अंतिम तिकीट मिळलेले नाही.
इंग्लंडला 10 विकेट्स राखून पराभूत करून भारताने 71.0 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये 64.1 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. या टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 69 टक्के गुणांसह तिसर्या स्थानावर आहे. यापूर्वी अंतिम तिकीट मिळवणारा न्यूझीलंड 70 टक्के गुणांसह दुसर्या स्थानावर आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी आता इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेची चौथी व अंतिम कसोटी जिंकणे किंवा अनिर्णीत ठेवणे भारताला आवश्यक आहे. इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी गमावली, तर ही मालिका 2-2 अशी बरोबर होईल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. कोणत्याही परिस्थितीत भारताला चौथ्या कसोटीतील पराभव टाळावा लागेल.
भारताविरुद्धच्या तिसर्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर इंग्लंड आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर झाला. आता जर इंग्लंडने भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या कसोटीतही विजय मिळवला तरी तो अंतिम सामन्यात प्रवेश करू शकणार नाही.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper