कोलकाता ः वृत्तसंस्था
एक काळ असा होता जेव्हा बंगाल अध्यात्म आणि स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करीत होता. वंदे मातरम गीताने भारताला एकत्रित आणण्याचे काम केले. आता मात्र बंगालमध्ये गुंडाराज आहे. मोदी सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहचत नाहीत. यामध्ये सर्वांत मोठा अडथळा हा तृणमूल काँग्रेस सरकारचा आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ते झारग्राममधील सभेत व्हर्चूअल माध्यमातून बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल आणि आसाम दौर्यावर होते. बंगालमधील खडगपूरमध्ये त्यांच्या हॅलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांनी सोमवारी (दि. 15) झारग्राममधील सभेला व्हर्चूअल माध्यमातून संबोधित केले. या सभेमध्ये शाह यांनी सत्ताधारी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला.
शाह म्हणाले, बंगालमध्ये मागील 10 वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचे सरकार असून, त्यांनी राज्याला पाताळापेक्षाही भयंकर अवस्थेत नेण्याचे काम केले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार, घुसखोरी असल्याने बंगालचा विकास झालाच नाही. हिंदूंना, आदिवासींना त्यांचे सण साजरे करण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मोदी सरकारने मागील 10 वर्षांमध्ये दीदींची सत्ता असताना 115हून अधिक केंद्रीय योजना आदिवासी आणि इतर गरजूंसाठी राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या, मात्र या योजना तुमच्यापर्यंत पोहचल्या नाहीत. असे सरकार तुमच्या (सर्व सामान्यांच्या) काय कामाचे आहे, असा सवाल शाह यांनी या वेळी उपस्थित केला.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …