खारघर : प्रतिनिधी
पालिका क्षेत्रात बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेवारस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. खारघरपासून पनवेल शहरापर्यंत बेवारस वाहनांनी मोठ्या प्रमाणात रस्ते अडवले आहेत. त्यामुळे पनवेल पालिकेने बेवारस वाहनांवर नोटीसा चिटकविण्यास सुरुवात केली आहे.कोरोना काळात वर्षभरापासून बेवारस वाहने मालकांनी फुटपाथ, रस्ते आदींवर उभी केली आहेत. अनेक गाड्यांचे मालक गाड्या रस्त्यावरच सोडून इतरत्र स्थलांतरित झालेले आहेत. अशा परिस्थितीत बेवारस वाहनांवर कारवाईची गरज आहे. यासंदर्भात उपायुक्त सचिन पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सध्याच्या घडीला बेवारस वाहनांवर नोटीसा चिटकविण्याचे काम पालिकेने सुरु केले असल्याचे पवार यांनी सांगितले. चारही प्रभागात 50 पेक्षा जास्त वाहनांवर नोटीसा चिटकविण्यात आलेल्या आहेत. संबंधित गाड्यांच्या मालकांनी या गाड्या न हटविल्यास पालिका हि वाहने जप्त करणार आहे. या वाहनांमध्ये दुचाकीपासून, तीन, चारचाकी व अवजड वाहनांचादेखील समावेश आहे.
सध्याच्या घडीला अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना नोटीसा चिटकविण्याचे काम सुरू आहे. या गाड्यांच्या मालकांनी ही वाहने हटविली नाही तर लवकरच ही वाहने जप्त करण्यात येतील.
-सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
RamPrahar – The Panvel Daily Paper