Breaking News

ऑक्सिजनअभावी सहा रुग्णांचा मृत्यू

अंबाजोगाईत नातेवाईकांचा आरोप

अंबाजोगाई : प्रतिनिधी
राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यूच्या गंभीर घटना घडताना दिसत आहेत. नाशिकमधील महापालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत 24 रुग्णांनी प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशीच घटना घडल्याचे वृत्त आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे, मात्र नातेवाइकांचा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावला आहे.
अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन आणि तीन या वार्डांमध्ये करोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या वार्डातील ऑक्सिजनपुरवठा अर्धा तास खंडित झाल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगत ऑक्सिजन बंद झाल्यानेच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. अर्धा ते एका तासादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा हा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावला आहे. ज्या रुग्णांचे मृत्यू झाले त्यांना कोरोनाबरोबर सहव्याधी होत्या आणि रुग्णालयात येतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती, असे प्रशासनाने म्हटले आहे.
रुग्णालयाने आरोप फेटाळले
मागील तीन-चार दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे, पण लातूर, औरंगाबाद, जालना, बीड येथून ऑक्सिजन मागवत आहोत. आजही सकाळपासून लातूरहून ऑक्सिजन सिलिंडर मागवले. आयसीयूजवळ मी स्वतः होतो. वार्ड नंबर 3जवळही उभा होतो. या घटनेचा पूर्ण अहवाल मी मागवला आहे. अहवाल आल्यानंतर सगळे स्पष्ट होईल, पण ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत्यू झाल्याचे चूक आहे, असे सांगत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी नातेवाइकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply