Breaking News

बारा बलुतेदारांना आर्थिक साहाय्य द्या; भाजपची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

राज्यातील बारा बलुतेदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन काळात त्यांचे धंदे बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने त्यांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज घोषित करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भाजप महाराष्ट्र ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, भाजप ओबीसी मोर्चा महिला रायगड जिल्हा अध्यक्ष सीताताई पाटील यांनी सोमवारी (दि. 26) पनवेल तहसीलदारांना दिले. पुरातन काळापासून राज्यात बारा बलुतेदार पद्धत अस्तित्वात आहे. प्रत्येक गावात न्हावी, शिंपी, सुतार, कुंभार, परीट अशा परंपरागत वेगवेगळ्या सेवा पुरवणार्‍या बलुतेदारांचा व्यवसाय सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळे गरीब असलेला हा समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने राज्यात काहींनी आत्महत्या केल्याचेही उघड झाले आहे. शासनाने रिक्षाचालक, बांधकाम मजूर, फेरीवाले आदी घटकांना आर्थिक पॅकेज जाहीर केले, परंतु या बारा बलुतेदारांना कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर केले नाही. यासाठी राज्य सरकारने बारा बलुतेदारांचा सहानुभूतीने विचार करून या परंपरागत व्यावसायिकांना प्रतिकुटुंब किमान पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी भाजप महाराष्ट्र ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, भाजप ओबीसी मोर्चा महिला रायगड जिल्हा अध्यक्ष सीताताई पाटील यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन केली आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply