खालापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील बीडखुर्द गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी (दि. 27) ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन, आमचा पाण्यासाठीचा वनवास कधी संपणार?, अशी विचारणा केली. या वेळी आजपासून गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती सरपंच कविता पाटील यांनी दिली. खालापुर तालुक्यातील बीडखुर्द गावात कोरोना संकटाबरोबरच एक नवीन संकट उभं राहिलंय. एप्रिलच्या शेवटला पाणीटंचाई भेडसावू लागलीय. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे. गावातील महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच कविता भानुदास पाटील यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. या वेळी सरपंच यांनी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारांची माहिती दिली. आणि आजपासून गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले.
पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार केल्याने पंचायत समितीमार्फत टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक
मेहनत घेईन.
-कविता पाटील, सरपंच