नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी आयपीएलच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेट्स व 9 चेंडू राखून सहज विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विजयाचे श्रेय अंतिम 11 खेळाडूंव्यतिरिक्त बाकावर बसलेल्या प्रत्येक खेळाडूला दिले.
फलंदाजांची कामगिरी दमदार होती, परंतु याचा अर्थ असा नाही की गोलंदाजांनी निराश केले. दिल्लीची खेळपट्टी आश्चर्यकारक ठरली. येथे दवही नव्हते. सलामीवीरांच्या कामगिरीचे विशेष कौतुक आहे. समस्यांचा पाढा वाचण्यापूर्वी त्यावरील उपाय शोधणे योग्य असते. 5-6 महिने आम्ही क्रिकेटपासून दूर होतो आणि मागील पर्वही आमच्यासाठी खडतर गेले. दीर्घ क्वारंटाइन आणि असे अनेक प्रश्न आहेत. यापैकी मी काही सोडवण्याचा प्रयत्न केला, तर या वर्षी खेळाडूंनी जास्त जबाबदारी स्वीकारली आहे, असे धोनी सामन्यानंतर म्हणाला.
धोनी पुढे म्हणाला की, मागील 8-10 वर्षांत आम्ही संघात फार बदल केले नाहीत. ज्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नाही त्यांचेही कौतुक करायला हवे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा त्यासाठी सज्ज राहा. हे खेळाडू ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले ठेवतात. त्यामुळेच ज्यांना संधी मिळालेली नाही, अशा खेळाडूंना अधिकचे श्रेय द्यायला हवे.