माणगाव : प्रतिनिधी
रायगडच्या विकासाला केंद्र व राज्यातील युती सरकारमुळे चालना मिळाली असल्याचा दावा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी रविवारी (दि.14) माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला.
ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत युती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे तसेच वैयक्तिक योजनेतून मिळालेल्या लाभामुळे आमच्या
मतदारसंघातील जनता समाधानी आहे, आनंदी आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये अनेक विकासकामांना गती आली आहे. अनेक रखडलेले प्रकल्प सुरू झाले आहेत. देशात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये रायगडचा शिलेदार असला पाहिजे. यासाठी येथील मतदार महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनाच मतदान करतील. रायगडमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प सुरु आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, एअरपोर्ट, सी-लिंक, रायगड किल्ला विकास, राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपला खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात पाहिजे, असे कोबनाक म्हणाले.
राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराची कारकीर्द पाहता त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप आहेत. कोर्टकचेरी चालू आहे. त्यांना सुज्ञ जनता संधी देणार नाही, असा विश्वास कृष्णा कोबनाक यांनी व्यक्त केला. आम्ही महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करून दिल्लीमध्ये पाठवणारच, अशी ग्वाही कृष्णा कोबनाक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
– नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसला असून, देशाची अर्थव्यवस्था सुधारली आहे. त्यामुळे जगात 11व्या क्रमांकावरील आपला देश सहाव्या क्रमांकावर आला आहे. नोटबंदी करणे ही काळाची गरज होती. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली.
-कृष्णा कोबनाक, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा भाजप