Breaking News

शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय

दरेकरांचा संजय राऊतांना टोला

मुंबई ः प्रतिनिधी
राजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही आता अशीच चंचल झाली आहे, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे भाष्य केले होते. या वक्तव्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते रविवारी (दि. 13) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते चंचल असतात, पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा चंचल नसावी. शिवसेनेच्या बाबतीत हीच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी त्याचा विचार करावा, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत, मात्र अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही याकडेही प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणाबाबत टोलवाटोलवी
मराठा आंदोलनकर्त्यांनी त्यांची ताकद दिल्लीत दाखवण्याची गरज आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत म्हटले होते. यावरून प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. आधी शिवसेना संभाजीराजे यांचे समर्थन करीत होती, पण आता संजय राऊत म्हणत आहेत की, त्यांनी दिल्लीत ताकद दाखवावी. ही एक प्रकारे टोलवाटोलवी सुरू असल्याचेही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply