Breaking News

‘दिबां’च्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव

किमान एक लाख लोकांचा असणार सहभाग; आंदोलनाची जय्यत तयारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ‘दिबां’च्या स्मृतिदिनी होणार्‍या या आंदोलनात किमान एक लाख लोकांचा सहभाग असणार असून त्याच वेळी पुढील आंदोलनाचीही घोषणा करण्यात येईल, असे मंगळवारी (दि. 15) पनवेलमध्ये झालेल्या कृती समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले.
आगरी समाज मंडळच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या रायगड व नवी मुंबई विभागाच्या या बैठकीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कॉ. भूषण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषेदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, दीपक पाटील, रूपेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, दशरथ भगत, नंदराज मुंगाजी, साई संस्थानचे विश्वस्त रवी पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, जयेश आकरे, धीरज कालेकर, राजेश गायकर, सीमा घरत, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते, युवा नेते राजेश मपारा, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, कामगार नेते सुरेश पाटील यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात सर्वपक्षीय कृती समितीने लढा उभारला आहे. त्यांना भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांसह सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. 10 जूनला रायगड ते नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ ते मुंबई असा ’भूतो न भविष्यतो’ मानवी साखळी आंदोलन झाले. याची दखल केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने घेतली. या आंदोलनानंतर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्याचे नियोजन जोरात सुरू आहे. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात सखोल चर्चा झाली. या आंदोलनात भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, स्थानिक, कृती समिती, संस्था संघटना, विविध राजकीय पक्षांचे गाव ते शहरातील किमान एक लाख जणांचा समावेश असणार आहे आणि तशी जय्यत तयारी सुरू आहे.
राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत 40 ते 50 संघटनांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात पत्र दिल्याचे म्हटले आहे. मग एवढी निवेदने दिली असतानाची माहिती असताना ‘दिबा’साहेबांच्या नावाला का विरोध करता, असा सवाल या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला तसेच त्यांचा विरोध ‘दिबा’साहेबांच्या नावाला आहे, तो विरोध सहन करायचा नाही. 24 जूनला घेरावाच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर केसेस करतील. ‘दिबा’साहेबांना सीमेवरील आंदोलनात एक वर्षाची जेल झाली होती, तर आम्ही केसेस कारवाईसाठी का घाबरावे असे सांगतानाच 24 तारखेचे आंदोलन शेवटचे नाही तर यापुढे यापेक्षा प्रखर आंदोलने केले जातील, असेही त्यांनी अधोरेखित केले.
चांगले करता येत नसेल तर वाईटही करू नका!
महाविकास आघाडीच्या स्थानिक पुढार्‍यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध करून सर्व समाजाच्या भावना दुखावल्या.  युवा पिढीपासून महिला आणि वृद्धापर्यंत सर्वांना दुखावण्याचे काम महाविकास आघाडीच्या पुढार्‍यांनी केले. त्यामुळे विशेषत्वाने युवा पिढीने या बैठकीत बोलताना आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत समाजामध्ये गैरसमज पसरवू नका आणि चांगले करता येत नसेल तर वाईटही करू नका, असा सल्लावजा इशारा महाविकास आघाडीच्या पुढार्‍यांना दिला.
‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष करीत राहू -लोकनेते रामशेठ ठाकूर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी सांगितले की, दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे ही पहिल्यापासूनच सर्वांची मागणी आहे. या संदर्भात भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, ग्रामपंचायती, संस्था, संघटनांनीही मागणी केली आहे. या अनेक मागण्या असताना मंत्री एकनाथ शिंदे यांची एक मागणी येते आणि लगेच ठराव घेतला जातो. ही कुठली नीती? भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची आधी मागणी केली तरी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी नंतर सुफी संत सुल्तानूल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर खासदार शेवाळेंनी ती मागणी मागे घेतली. त्याचप्रमाणे ना. एकनाथ शिंदेंनी ‘दिबां’च्या नावाच्या सर्वप्रथम मागणीचा मान ठेवून आपले मन मोठे करावे आणि विमानतळाला ‘दिबा’साहेबांचेच नाव द्यावेे. ते पुढे म्हणाले, 10 जूनला आंदोलनाची पहिली पायरी यशस्वी झाली. 24 जूनला सिडकोला घेराव आणि त्यानंतरही ‘दिबां’च्या नावासाठी टप्प्याटप्य्याने संघर्ष तीव्र करीत राहू. 24 जूनच्या घेरावावेळी पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल.
‘दिबां’च्या नावाला पर्याय नाही -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी 10 जूनचे मानवी साखळी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे यासाठी आता 2008 साली मागणी झाल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, विमानतळाचे काम अद्यापही पूर्णत्वास आले नसल्याने साहजिकच नामांतराचा विषय नव्हताच, मात्र अचानकपणे मंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी आणि सिडकोच्या ठरावाने भूमिपूत्र दुखावला. या अनपेक्षित प्रकारामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध करण्याचा डाव उघडकीस आला. त्या अनुषंगाने जासई येथे झालेल्या बैठकीत ‘दिबां’च्या नावासाठी रणशिंग फुंकण्यात आले. त्यानंतर आंदोलनाच्या तयारीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला कृती समितीला बोलावले तसेच महाविकास आघाडीच्या स्थानिक पुढार्‍यांना पाचारण केले. त्या बैठकीत कृती समितीने ठामपणे ‘दिबा’साहेबांचेच नाव पाहिजे ही भूमिका मांडली, मात्र आता महाविकास आघाडीच्या पुढार्‍यांनी लोकांमध्ये संभ्रम सुरू केला आहे. असे असले तरी ‘दिबां’च्या नावाला दुसरा पर्याय नाही हे आम्ही ठामपणे सांगितले आहे.

10 जूनच्या आंदोलनाने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे हा संदेश देशभर पोहचविला आहे. या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता तर फक्त ‘दिबा’साहेब हाच ध्यास होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखी मंडळी पाठीशी असल्याने या लढ्याला ताकद मिळाली आहे. आम्हाला ‘दिबां’चे नाव नवी मुंबई विमानतळालाच पाहिजे, बाकी कुठेही नको ही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ठाम मांडली आहे. मी शिवसेनेचा उपनेता आहे, पण ‘दिबां’साठी आमचा संघर्ष कायम राहणार आहे. विरोधक आता अफवा पसरविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कृपा करून कुणीही समाजात तेढ निर्माण करू नये.
-दशरथ पाटील, अध्यक्ष, कृती समिती

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कृती समितीने दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे ही ठाम भूमिका मांडली. असे असतानाही महविकास आघाडीतील काही पुढार्‍यांकडून जनतेची जाणूनबुजून दिशाभूल करण्याचे पाप केले जात आहे.
-जे. डी. तांडेल, खजिनदार, कृती समिती

समाजातील फितूर झालेले नेते कॅमेर्‍यासमोर येऊन काहीही वक्तव्य करीत सुटले आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. ‘दिबां’च्या नावाला विरोध करणार्‍यांचा निषेध करू तेवढा कमी आहे.
-के. के. म्हात्रे, भाजप नेते

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply