Breaking News

24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जय्यत तयारी; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठकांचा धडाका

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल तालुक्यातील आकुर्ली, रिटघर, वाकडी आणि खैरणे या पंचायत समिती विभागनिहाय बैठका गुरुवारी (दि. 17) उत्साहात झाल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी 10 जून रोजी रायगड, ठाणे, मुंबई व पालघर जिल्ह्यांत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास उदंड प्रतिसाद लाभला. आता येत्या 24 जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव घालण्यात येणार असून, या आंदोलनाचीही जोरदार तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनात किमान एक लाख लोकांचा सहभाग असणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पंचायत समिती विभागनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गत गुुरुवारी आकुर्ली, रिटघर, वाकडी आणि खैरणे या ठिकाणी बैठका झाल्या. या बैठकांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंढरीशेठ फडके, एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील तसेच नरेश पाटील, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी 24 जूनचे आंदोलनही यशस्वी करण्याचा निर्धार या वेळी केला.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे -प्रवीण दरेकर

मुंबई ः नवी मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. जे. आर. डी. टाटा यांचे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे, पण नवी मुंबईचा विकास प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे त्यांचे नाव तेथील विमानतळाला द्यावे, असा भूमिपुत्रांचा आग्रह असून त्यानुसार या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, ही भाजपची भूमिका आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरेकर म्हणाले की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या लढ्याचे नेतृत्व दि. बा. पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाजभूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणार्‍या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही भाजपची भूमिका आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply