माणगाव : प्रतिनिधी
पाटणूस ग्रामपंचायतीचे हद्दीतील देवकुंड धबधबा निसर्ग प्रेमींसाठी खळखळून वाहत आहे. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र तसेच विविध भागातून पर्यटक भिरा, येथील देवकुंडाला पर्यटनासाठी येतात. गेल्या चार वर्षांपूर्वी याच देवकुंडात अनेक पर्यटक बुडाल्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे तेथे प्रशासनाने निर्बंध लादण्यात आलेले आहे. तरीही अनेक पर्यटक तसेच वर्षासहलीसाठी निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात येथे येतात. त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव रायगड जिल्ह्यात अधिक होण्याची शक्यता नागरीकातून बोलताना व्यक्त होत आहे. या परिसरातील गांभिर्य लक्षात घेऊन तसेच आगामी काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी माणगांवचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 (1) (4) अन्वये प्राप्त अधिकारानुसार माणगाव तालुक्यातील भिरा गांवचे हद्दीतील देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या एक कि. मी. च्या परिसरात धरण, तलाव, धबधब्याचे परिसरात 21 जून ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागु केले असल्याने वर्षा सहलीसाठी येणार्या पर्यटकांना आता याठिकाणी मौजमजा करता येणार नाही. तसेच निसर्गाचा आनंदही घेता येणार नाही. असे असले तरी पर्यटक तसेच वर्षासहलीसाठी मोठ्या प्रमाणात येथे येतात. पर्यटक आपल्या खासगी वाहनातून येतात. शुक्रवारी रात्री वस्तीला परिसरातील गावातील खोल्या, हॉल, हॉटेलमध्ये वास्तव्य करून शनिवारी पहाटे काही पर्यटक तर काही दिवसभरात कधीही ये-जा करतात. रविवारी तसेच अन्य सुट्या दिवसा तर पर्यटकांची तोबा गर्दी असते. या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत असल्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येत आहे. यांचेवर कारवाई कोण करणार हा प्रश्नच आहे.