Breaking News

मोदी सरकारचे नवे मंत्रालय सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी उपयुक्त ः आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 8) व्यक्त केली. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, मोदी सरकारने मंगळवारी नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला, तर बुधवारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात या नव्या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थ नेतृत्वावर सोपविली आहे. नवे मंत्रालय हे सहकार क्षेत्रासाठी ईज ऑफ डुइंग बिझनेस-व्यवसाय सुलभता निर्माण करण्यास आणि मल्टीस्टेट सहकारी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सहकार क्षेत्राला सध्या मोठ्यास्पर्धेला तोंड द्यावे लागत असून या क्षेत्रालाही व्यवसाय सुलभता मिळण्याची गरज आहे यावर मोदी सरकारने भर दिला हे महत्त्वाचे आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला केंद्र सरकारच्या धोरणांचे आणि कायद्यांचे पाठबळ मिळेल. त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक शिस्त निर्माण करण्यास व सध्याच्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल. सहकार क्षेत्रावर अवलंबून असलेल्या सामान्य शेतकरी व ठेवीदारांच्या हिताचे मोदी सरकारच्या निर्णयामुळे रक्षण होईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply