अलिबाग ः जिमाका
रायगड जिल्ह्यात 11 ते 15 जुलैदरम्यान जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीत घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. या कालावधीत आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. घरात पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तत्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे. अतिवृष्टीच्या कालावधीत किमान तीन दिवस पुरतील असे सुकामेवा खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत. अतिवृष्टीबाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. रेडिओसाठी काही जास्त सेल, बॅटर्या जवळ ठेवाव्यात. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र, खाडीकिनारी आणि नदीकिनारी राहणार्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी आणि घराबाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. याव्यतिरिक्त इतर काही मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 02141-222097/227452 वर संपर्क साधावा किंवा मो. 8275152363 नंबरवर व्हॉट्सअॅप करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper