टोकियो ः वृत्तसंस्था
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू सरावात व्यस्त झाले आहे. यंदा पदक जिंकण्याच्या इराद्यानेच लढत द्यायची या निर्धारासह प्रत्येक जण घाम गाळत आहे. भारताचे पहिले पथक रविवारी नवी दिल्लीतून येथे दाखल झाले. याशिवाय काही भारतीय खेळाडू वेगवेगळ्या देशातून येथे आधीच पोहचले आहेत, तर काही नंतर येत आहेत. टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट आहे. काही खेळाडू आणि सपोर्ट स्फाटमधील लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगली जात आहे. अशातच तिरंदाज दीपिका कुमारी, अतानु दास, टेटे खेळाडू जी. साथियान आणि अचंता शरथ कमल, बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणीत, देशाचे प्रतिनिधित्व करीत असलेली एकमेव जिम्नॅस्ट प्रणिती नायक यांनी सरावाला सुरुवात केली. चिराग शेट्टी, सात्त्विक साईराज रंकीरेड्डी या दुहेरी जोडीने कोच मॅथियस बो यांच्या मार्गदर्शनात कोर्टवर बराच वेळ घाम गाळला. व्ही. सरवणनसह नौकायान पथकातील खेळाडूृंचा सराव आधीच सुरू झाला. सरवणन (पुरुष लेजर वर्ग), नेत्रा कुमानन, केसी गणपथी आणि वरुण ठक्कर मागच्या आठवड्यात टोकियोत दाखल झाले होते. भारताचे 15 सदस्यांचे नेमबाजी पथकदेखील रेंजवर गेले. आयोजन समितीच्या नव्या निर्देशानुसार हे खेळाडू क्रोएशियातून येथे दाखल झाल्यामुळे त्यांना क्वारंटाइनचा नियम लागू नव्हता.
RamPrahar – The Panvel Daily Paper