Breaking News

क्रांतिदिनी 9 ऑगस्टला भूमिपुत्र पुन्हा एकवटणार

‘दिबां’च्या नावासाठी गावोगावी मशाल मोर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 6) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन. 1942 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या दिवशी मुंबई येथील गोवालिया टँक येथून समस्त भारतीयांना ‘अंग्रेज चले जाओ’ अशी हाक दिली. त्याच धरतीवर दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी केल्या जाणार्‍या आंदोलनाला दडपणार्‍या राज्य सरकारच्या विरोधात हा मशाल मोर्चा काढण्यात येत आहे.
पनवेल येथील पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कामगार नेते भूषण पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, संतोष केणे, सुरेश पाटील, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, प्रत्येक मशाल ही दि. बा. पाटील यांनी दिलेल्या क्रांतीच्या लढ्याची ओळख असेल. त्यामुळे प्रत्येक गाव आपल्या भूमिपुत्रांच्या व्यथा या मशाल मोर्चाद्वारे मांडणार आहे. या मशाल मोर्चात शपथ घेऊन पुढच्या तीव्र आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पत्रकारांना अधिक माहिती देताना, कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, मशाल मोर्चा हा 10 व 24 जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. या मशाल मोर्चासाठी ज्या मशाली प्रज्वलित केल्या जातील त्यांची सुरुवात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून म्हणजे उरण तालुक्यातील जासई येथून, महापुरुष, हुतात्म्यांना, तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करून करण्यात येईल. त्यासाठी 9 ऑगस्ट रोजी तेथे एक मोठी क्रांती ज्योत प्रज्वलित केली जाईल. या वेळी कृती समितीचे सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध जिल्ह्यांतून, तालुक्यातून व विभागातून आलेले विशेष प्रतिनिधी, त्या मुख्य मोठ्या ज्योतीद्वारे आपल्या मशाली प्रज्वलित करतील व आपापल्या ठिकाणी घेऊन जातील. त्यानंतर विशेष प्रतिनिधींनी नेलेल्या मशालीची ही क्रांतिज्योत, त्या त्या ठिकाणच्या गावागावातून आलेले प्रतिनिधी, गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावासाठी ही क्रांतिज्योत प्रज्वलित करतील आणि गावात वा विभागात ‘मशाल मोर्चा’ काढतील. या वेळी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाची प्रतिज्ञा केली जाईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
कृती समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल यांनी सांगितले की, आज सरकार भूमिपुत्रांना सूडाची वागणूक देत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे. या आंदोलनाद्वारे हा संताप व्यक्त करून दि. बा. पाटील यांनी दिलेल्या लढ्याच्या प्रश्नांना पुन्हा वाचा फोडण्यात येईल. दि. बा. पाटील यांच्या अलौकिक कार्याची प्रेरणा घेऊन, आपला नामकरणाचा लढा यशस्वी करणे, हाच हेतू ध्यानात घेऊन या क्रांतीच्या मशाली प्रज्वलित केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देईपर्यंत मागे हटायचे नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत केंद्राला घाई नाही, मात्र ठराविक नाव देण्याची घाई महाराष्ट्र सरकारला झाली. त्यामुळेच संघर्षाची लढाई सुरू झाली, पण ही लढाई जिंकण्यासाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त मैदानात उतरला आहे. 15 ऑगस्ट सरकारला डेडलाईन दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने न्याय द्यावा; अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडले जाईल, अशी रोखठोक भूमिका कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मांडत ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला देईपर्यंत कदापिही मागे हटायचे नाही, अशी गर्जनाही केली.

आयुष्याच्या सुरुवातीपासून ते अंतिम श्वासापर्यंत लोकनेते दि. बा. पाटील यांनी लोकांसाठी संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाची जाणीव भूमिपुत्रांना आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दडपशाहीला भूमिपुत्र घाबरणार नाही.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, कृती समिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा उरणमध्ये आले होते त्या वेळी जेएनपीटी साडेबारा टक्के इरादापत्र वाटप करण्यात आले. त्यानुसार विकसित भूखंडाचे वितरण करण्याला वेग आला. त्या संदर्भात 400 कोटी रुपये सिडकोकडे वर्ग झाले. केंद्र सरकारने त्यांचे काम पूर्ण केले, मात्र सिडको आणि राज्य शासन यांच्या आकसापोटीच्या  भूमिकेमुळे कार्यवाही जाणूनबुजून थंडावली आहे. विमानतळाला ‘दिबा’साहेबांचे नाव देण्यासाठी पुढील आठवड्यात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री, तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री यांची कृती समिती भेट घेणार आहे.
-आमदार महेश बालदी, कार्यकारिणी सदस्य, कृती समिती

9 ऑगस्ट हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे. राज्यातून भूमिपुत्र एकवटला असून आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांच्या बॅनरमध्ये शुभेच्छा देताना विमानतळाला ‘दिबां’चे नाव असे अनेक ठिकाणी बॅनर झळकले, यावरून ‘दिबां’च्याच नावाला राज्यभरातून मान्यता मिळत असल्याचे स्पष्ट आहे. हे आंदोलन सर्व समाजाचे आहे. त्यामुळे ‘दिबां’च्या नावासाठी सर्वांचे स्वागत आहे. त्यामुळे समितीतून सर्वपक्षीय नाव काढले नाही.
-कॉम्रेड भूषण पाटील, कामगार नेते

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply